रविवार, १४ फेब्रुवारी, २०२१

प्रिय चहास ...

प्रिय चहास,
सप्रेम नमस्कार विनंती विशेष,

पत्रास कारण कि, तसं पाहिलं तर तुझी आणि माझी साथ अगदी लहानपासूनची आहे, पण आभार प्रदर्शनाची संधी कधी मिळाली नाही. किंबहुना सगळ्यात जवळच्या असणाऱ्या तुझ्याकडे सर्वात जास्त दुर्लक्ष झालं आमचं. पण कधीही न करण्यापेक्षा, उशिरा का होईना ते आभार प्रदर्शन करणे श्रेयस्कर आहे (Better late than never / देर आये दुरुस्त आये) नाही का? तर त्यासाठीच हा सगळा पत्रप्रपंच 😊

दररोज सकाळी तू मिळालास कि दिवसाची सुरुवात कशी ताजी तवाणी होते, जणू उगवतीच्या सूर्यदेवाने गोड दिवसाची गोड सुरुवात करण्यासाठी दिलेला आशीर्वादच. दररोज सकाळचा नित्यक्रम असल्यामुळे, तुझ्या या गोष्टीच तितकंसं महत्त्व समजत नाही आम्हाला कधी. पण कधी काळी हा नित्यक्रम चुकला तर दिवसाची सुरुवातच चुकल्या चुकल्या  सारखी होते, आणि तेव्हा आम्हाला समजते कि दिवसाची सुरुवात गोड करण्यासाठी तू किती महत्वाचा आहेस ते. कोरोनाच्या काळात लॉकडाऊन मुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, चहा टपऱ्या सगळं काही बंद होत. नोकरीच्या ठिकाणी एकटं राहत असल्यामुळे, सुरुवातीचे काही दिवस सकाळी तुझी भेट न होण्याचा हा कटू अनुभव मी  घेतला आहे. पण नंतरच्या काळात ऑनलाईन अन्न वितरण (फूड डिलिव्हरी) करणाऱ्या कंपनीच्या मदतीने तुझ्या-माझ्या भेटीची सोय झाली, तेव्हा कुठे थोडं हायसं वाटलं. कामावरून घरी गेलो किंवा बहरून दमून घरी गेल्या नंतर, तुझा एक कप मिळाला कि मन कसं प्रफुल्लित व्हायला होत.

तुझ्यातील गोडवा नातेसंबंधामध्ये उतरवून, नातेसंबंधामध्ये गोडवा वाढवण्याचे काम तर तू कित्येक वर्षांपासून करत आहे. उपवर वधू-वरांच्या ओळखीची सुरुवात तर चहा-पानाच्या कार्यक्रमापासूनच होते, सोबतीला पोहे असतात. आपल्या घरी कुणी पाहुणे किंवा मित्र मंडळी आली तर त्यांचे स्वागत तुझ्या पासून च होते. आपण बाहेर असताना कुणी ओळखीचे भेटलं कि "चला चहा घेऊ" असा शब्द आपसूकच निघतो. अगदी विधानसभेच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सुद्धा सत्ताधारी आणि विरोधक असा दोघांचा एकत्र चहापान कार्यक्रम ठेवलेला असतो. अधिवेशनात कोणकोणते मुद्दे चर्चेसाठी यायला हवे याची चर्चा करण्याच्या उद्देशाने चहापान कार्यक्रम आयोजित केला जातो. म्हणजे एकूणच राज्याचा विकास आणि सत्ताधारी-विरोधक यांच्या मध्ये एक सलोख्याचे वातावरण निर्माण करणे, या कामा मध्ये सुद्धा तू एक छोटीशी भूमिका पार पडत असतोस (हल्ली विरोधक मग ते कुणीही असो, नेहमी या कार्यक्रमाचा बहिष्कार करत असतात तो भाग वेगळा). प्रसारमाध्यमांनीही "चाय पे चर्चा" म्हणत वेगळंवेगळ्या क्षेत्रातील लोकांना एकत्र अनंत अनेक वादविवाद (Debate) घडवून आणले आहेत. तर तात्पर्य काय कि क्षेत्र कोणताही असो, नातेसंबंध दृढ करण्याच्या दृष्टीनेही तू नेहमीच महत्वपूर्ण भूमिका वठवत आला आहेस.

तुला इंग्रजानी भारतात आणला, असा गैरसमज आपल्याकडे आहे. पण भारतात इंग्रज येण्याच्या खूप आधी पासून तुझं अस्तित्व होत, असा उल्लेख इतिहासात आढळतो. तुझं स्वरूप फक्त काही ठिकाणी वेगळं होतं आणि तुझा व्यावसायिक वापर होत नव्हता. इंग्रजानी फक्त तुझे व्यावसायिक उत्पादन सुरु केले आणि मोठ्या प्रमाणात तुझ्या लागवडीस प्रोत्साहन दिले. भारतात तर तुझे खूप सारे वेगळे वेगळे प्रकार आढळतात - साधा चहा, काळा चहा (ब्लॅक टी), काश्मिरी कावा, गुळाचा चहा, मसाला चहा आणि याच्या व्यतिरिक्त हि खूप प्रकार असतील जे मला माहिती पण नाहीत. प्रत्येकाच्या आवडी-निवडी आणि भौगोलिक परिस्थिती नुसार लोकांनी तुला वेग वेगळी चव दिली आणि प्रत्येक परिस्थिती आत्मसात करून तू त्यांना तुझा आनंद देत राहिलास आणि अजूनही देत आहेस आणि यापुढेही देत राहशील.

पार्ले-जी बिस्कीट सोबत चहाच एक अनोखं नातं आहे, पण इतरहि अनेकांसोबत तू चांगलाच मिसळून जातोस. बिस्कीट, खारी, टोस्ट यांच्या सोबतच महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात चहा आणि चपाती यांचही अनोखं नातं जपलं जात. पुण्या सारख्या किंवा इतरही मोठ्या शहरात जिथे मोठ-मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत त्यांच्या बाहेर चहा सोबत सुट्टा (सिगारेट) असं एक अनोखं नातं पाहायला मिळतं, हे संयोजन कामामुळे आलेला मानसिक तणाव कमी करण्यासाठी कामात येत. तर सांगायचं उद्देश्य हा कि, शहरी-ग्रामीण, श्रीमंत-गरीब, श्रमिक कामगार-अधिकारी असा कोणताही भेदभाव न करता सगळ्यांसोबत मिसळण्याची तुझी किमया सर्वानाच जमते असं नाही.

तुझा गर्भश्रीमंत समजला जाणारा चुलत भाऊ कॉफी आणि आमचं कधी जमलं नाही. तसं पाहिलं तर कॉफी हे श्रीमंत वर्गात मोडणारे पेय आहे, पण तू (चहा) गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वाना आधार देतोस. तुझा तिरस्कार करणारे लोक, काही वेळा काहीही कारण काढून चहा कसा वाईट आणि चहा का नाही पिला पाहिजे याचा बाऊ करतात. पण हाडाच्या चहाप्रेमींना त्याचा कधी फरक नाही पडला, चहाने येणारी तरतरी त्यांना काय समजणार आहे म्हणा. आम्हा हाडाच्या चहाप्रेमींसाठी चहा हे फक्त पेय नसून तो एक धर्म आहे. अमृततुल्य चहा या नावाने तर चहाची तुलना आम्ही डायरेक्ट अमृताशी केलेली आहे. अमृततुल्य कॉफी असं काही आता पर्यंत तरी कुठेही वाचनात किंवा ऐकिवात आलेलं नाही आमच्या. "कॉफी आणि बरच काही" असं म्हणून कॉफीचा मिजास वाढवण्याचा कितीही प्रयत्न केला, तरीही आम्हा चहाप्रेमींचा "चहासाठी काय पण, कधी पण आणि कुठे पण" हा रांगडा बाणा कुणालाही सोसवणारा नाही.

असो, आम्हा चहा प्रेमींसाठी तुझी महती सांगावी तेवढी कमीच आहे. आमच्या आयुष्यातील तुझे स्थान अढळ होतं, आहे आणि यापुढेही राहील. काळजी नसावी. तशीही आता माझी चहाची वेळ झालीच आहे, त्यामुळे जाता जाता काही ओळी ऐकवाव्या वाटतात - 

हमेशा तुमको चाहा, ओ चहा ☕ चहा ☕ चहा ☕
और चाहा कुछ भी नहीं
तुम्हे दिल ने है पूजा 
और पूजा कुछ भी नहीं

तुझाच,
एक चहाप्रेमी
(जिथे टी☕, तिथे मी 👨 )

रविवार, ३ मे, २०२०

कोरोनाचा बाऊ (बालगीत)

खेळायला जाताना,
नको म्हणते जाऊ।
आई म्हणते बाहेर आहे
कोरोनाचा बाऊ।।

कोरोना कोरोना,
काय आहे आई?
इवलासा विषांणू
जीव कसा घेई?

आई म्हणते विषाणू,
जीव घेत नाही।
दुर्लक्ष आपल्याला,
संकटात नेई।।

२० सेकंड स्वतःचे,
हात स्वच्छ धुवू।
घराबाहेर पडताना,
मास्क लावून जाऊ।।

गर्दीच्या ठिकाणी,
जाणे आपण टाळू।
सर्दी खोकला असेल तर,
टेस्ट करून घेऊ।।

पोलीस, डॉक्टर मामांचे,
ऋण कसे फेडू।
घरात गप्प बसून,
कोरोनाशी लढू।।

सरकारने सांगितलेले,
नियम सगळे पाळू।
कोरोनाला हरवून,
देश उभा करू।।

कोरोनाला हरवून,
देश उभा करू।।

कोरोनाला हरवून,
देश उभा करू।।

शनिवार, २ मे, २०२०

बाबाजींचे ज्ञान

वचन १ -
आयुष्यात खूपदा आपल्याला कठीण प्रसंगांना तोंड द्यायला लागते. अश्या वेळी नशिबाला दोष देत बसू नका. नशीब अशी कोणतीही गोष्ट आपल्या आयुष्यात नाहीये. जे काही आहे, ते आहे आपण घेतलेल्या निर्णयांचे परिणाम, आणि हे आपल्याला स्वीकारावेच लागेल. स्वतःच्या निर्णयांची जबाबदारी घ्या, आणि झालेल्या चुका उगाळत न बसता, पुढे चालत रहा, आयुष्य जगत रहा. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. अश्या वेळी "पक पक पकाक" सिनेमा मधील एक सुंदर वाक्य सांगावेसे वाटते, "आयुष्य खूप सुंदर आहे मित्रानो, त्याला आणखी सुंदर बनवूया".

वचन २ -
नियतीचा खेळ खूप विचित्र असतो. कधी-कधी एका क्षणात राजाचा रंक होतो, तर कधी क्षणात रंकाचा राव होतो. काही लोकांच्या आयुष्यात भरभरून सुख असतं, तर काही लोकांकडे सर्व काही असूनही त्यांचे आयुष्य अपूर्ण असतं. अशा वेळी व.पू. म्हणतात, "नियती ज्यावेळी एखाद्याच आयुष्य अपूर्ण ठेवते, त्याचप्रमाणे कुणाचा सहवास लाभल्यामुळे ते पूर्ण होईल, ह्याच उत्तर पण नियती जवळच असतं". आयुष्यात कधी-कधी आपल्या समोर असे काही कठीण प्रसंग येतात कि, नियतीपुढे आपल्याला सपशेल हार मानावी लागते. पण अशा प्रसंगी खचून जाऊन चालत नाही. लक्षात ठेवा, "नियती जेव्हा आपल्या हातातून काही हिरावून घेते, तेव्हा त्याच्या पेक्षा मौल्यवान असं काही तरी देण्यासाठी किंवा आपल्या हातून काही तरी चांगलं काम करवून घेण्यासाठी, ती आपला हात रिकामा करत असते". अश्याच एका नियतीच्या खेळाची गोष्ट घेऊन येत आहे लवकरच .

वचन ३ -
प्रेमाचं नातं हे आपुलकी, काळजी आणि विश्वास या ३ बंधांनी घट्ट विनले गेलेले असते. यातील काही बंध सैल झालेले असतील तर संवादाच्या मार्गाने आपण ते पुन्हा घट्ट करू शकतो.
पण यातील एकहि धागा तुटला असेल तर या नात्यापासून दूर गेलेले केव्हाही चांगले असते. तुटलेल्या धाग्यांनी ठिगळ लावून पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर त्या नात्याच्या सुंदरते पेक्षा ठिगळ जास्त उठून दिसू शकते.

वचन ४ -
आयुष्य खरोखरच खूप साधी, सोपी आणि सरळ गोष्ट आहे. पण आपला मी-पणा, अहंकार, दिखावा, खोटेपणा, चढाओढ, फक्त आणि फक्त घेण्याची प्रवृत्ती यांमुळे आपण ते गुंतागुंतीचे करून ठेवतो. मी-पणा, अहंकार न ठेवता स्वतःचे स्वत्व जोपासा. स्वतःची प्रगती करा पण मुद्दाम कोणाच्या अधोगतीस कारण होऊ नका. कोणताही दिखावा आणि खोटेपणा न करता, आपण जे आहोत जसे आहोत त्यात सुखी आणि समाधानी राहा. फक्त घेण्याची प्रवृत्ती न दाखवता, दातृत्वाचाही अनुभव घ्यावा. त्यासाठी फक्त पैश्याचेच दान करायला पाहिजे असं
नाही. आपले ज्ञान, अनुभव, निखळ मानाने दिलेला सल्ला या गोष्टी पैश्याच्या दातृत्वापेक्षा खूप मोठ्या आहेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे साधी, सोपी, सरळ विचारसरणी आणि निखळ मन यांमुळे सुखी आणि समाधानी आयुष्य जगता येते.

देणा-याने देत जावे
घेणा-याने घेत जावे
घेता घेता एक दिवस
देणा-याचे हात घ्यावेत.
कवी ---- विंदा करंदीकर

शनिवार, २५ एप्रिल, २०२०

सांगा खूप काही जास्त मागितलं का मी?

सकाळी उठल्या नंतर तिचाच चेहरा समोर असावा,
तिला पाहिल्या नंतर माझाही चेहरा नकळत खुलावा,
कधी तिने मला, तर कधी मी तिला चहा द्यावा,
चहाचा गोडवा आमच्या नात्यात उतरावा. 

कधी तिच्या गालावर खळी तर कधी नाकावर राग असावा,
अबोला तिचा हा जीवघेणा, मी तिचा राग काढावा,
अबोला संपला कि तिने मिठीत येऊन विरघळावं,
प्रेमाचा हा आलेख उत्तरोत्तर वाढतचं जावा.

कधी दुचाकीवरून उगीचच हुंदडायला जावं,
तिने खूप बोलावं आणि मी फक्त ऐकतच बसावं,
तिच्या शिवाय जगात कुणीच नाही असं वाटावं,
नंतर कधी तरी हेच आठवून खूप खूप हसावं.

रात्री जेवणानंतर, हातात हात घालून फिरावं,
फिरता फिरता तिला आईस्क्रीम खायला घेऊन जावं,
कधी खूप समजूतदार तर कधी खूप वेडसर वागावं,
आयुष्याचं हे वळण तिच्याच साथीनं चालावं.

रात्री तिने निरागसपणे झोपेत असावं,
मी तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहतच बसावं,
"गुगली वूगली वूश" करू वाटत असताना,
तिला तसेच निरागसपणे झोपेत राहू द्यावं.

सोमवार, २० एप्रिल, २०२०

शायरी...

गाल गुलाबी, होंठ शबाबी,
आँखों की वो हसीं चमक,
रेशमी जुल्फों का वो साया,
मदहोश करा दे उनकी महक

आपने आईने में देख कर,
जिस तरह खुद को सवारा होगा,
आप की इन्ही अदाओं पे,
आईना भी दिल हारा होगा
==========================================

वफ़ा तो हमने भी की थी,
पर हमको खुदा न मिला,
हमारे तसव्वुर का अंजाम,
दिल-ए-नादान को मिला,

नहीं बनेगी कामिल,
जिंदगी उनके बिना,
मोहब्बत का यह प्याला,
मुकम्मल ना हुआ.
==========================================

ख्वाहिशें मेरी इतनी भी क्या बड़ी थी ऐ ख़ुदा,
एक छाँव ही तो मांगी थी जिंदगी के धुप में,
समंदर सा ढूंढता रहा मैं साहिल, लहरों के सहारे,
पर मुकम्मल समा ना मिला किनारे की रेत में
==========================================

ठहराव की तलाश में यु ही,
भटकता रहा मैं दर बदर |  
भूल  गया था शायद,
झांकना खुद के ही अंदर ||
==========================================

अस्त व्यस्त बानी पड़ी है जिंदगी,
लेकिन मन में एक सुकून सा है |
जिंदगी जीने का असली मजा,
आने लगा अब खालीपन में है ||

सोमवार, ९ मार्च, २०२०

स्त्री शक्ती


मायेचा आणि प्रेमाचा सागर आहे तू,
अखंड शक्तीचा जागर आहे तू,
तूच रूप देई जीवनाच्या आकारा,
तुझ्यामुळेच आहे घरपण घरा

माता, भगिनी, मैत्रीण, प्रेयसी, पत्नी
अश्या किती असती तुझ्या भूमिका,
प्रत्येक रुपात दिसे तू शोभूनी,
तूच आहेस जीवनाची खरी नायिका

महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐

शनिवार, १४ डिसेंबर, २०१९

मानवी संवेदनशीलता कुठे तरी हरवत चाललो आहोत का?

डिसेंबर २०१९ च्या सुरुवातीची हि घटना आहे. पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी येथे 'अमृत' योजनेंतर्गत ड्रेनेज लाइन टाकण्याचे काम सुरू असताना तीस फूट खोल खड्ड्यात अडकलेल्या कामगारांना वाचविण्याच्या प्रयत्नात पिंपरी-चिंचवड अग्निशामक दलाचा जवान शहीद झाला, तर एक कामगार ढिगाऱ्याखाली गाडला गेला. गाडल्या गेलेल्या कामगाराला बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरू असताना मातीचा ढिगारा कोसळून अग्निशामक दलाचे जवान ढिगाऱ्याखाली अडकले. अडकलेल्या कामगारासाठी 'एनडीआरएफ' व 'सीएमई'च्या जवानांकडून मदतकार्य सुरू होते.

दापोडी येथील विनियार्ड चर्चजवळ असलेल्या पाण्यांच्या टाक्यांशेजारी केंद्र सरकारच्या 'अमृत' योजनेंतर्गत मोठी ड्रेनज लाइन टाकण्याचे काम महापालिकेकडून ठेकेदारामार्फत सुरू आहे. तीस फूट खोल, पाच फूट रुंद तर ३० फूट लांब असा खड्डा खोदण्यात आला आहे. या खड्ड्यात काम करताना दोन कामगार माती अंगावर पडल्याने गाडले गेले. त्यामुळे या दोघांना बाहेर काढण्यासाठी दोन स्थानिक युवक खड्ड्यात उतरले. मात्र, भुसभुशीत झालेली माती या दोघांच्या अंगावर कोसळली. त्यामुळे अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. अग्निशामक दलाची एक गाडी व जवान घटनास्थळी दाखल झाल्यावर त्यांच्याकडून मदतकार्य राबविले जात होते. स्थानिक युवकांना बाहेर काढण्यात आले. तेव्हा बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. बघ्यांच्या गर्दीने खड्ड्यातून बाहेर काढलेल्या मातीचा ढिगारा जवानाच्या अंगावर कोसळला. यात तीन जवानांसह कामगार मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी तत्काळ ही माहिती पोलिस आणि अग्निशामक नियंत्रण कक्षाला कळविली. त्यानंतर पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागाच्या १० गाड्या, ५ रुग्णवाहिका व पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. बाहेर काढल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अग्निशामक विभागाने एनडीआरएफ आणि लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पथकाला मदतीसाठी पाचारण केले होते. ही दोन्ही पथके घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर या पथकांनी मदतकार्य हाती घेतले.

मदत कार्य सुरु असताना बघ्यांची वाढलेली गर्दी आणि त्यामुळे कोसळलेला मातीचा ढिगारा यांच्यामुळे आत अडकलेल्या लोकाना आपले प्राण गमवावे लागले. बहुतेकदा अश्या ठिकाणी जमलेल्या गर्दीची मानसिकता बघे आणि उत्सुकता अशी असते. पण या बघ्याच्या आणि उत्सुकतेच्या भूमिकेपोटी कुणाचा जीव जाणार असेल तर ते कितपत योग्य आहे? आपल्याला त्या ठिकाणी काही मदत करता येणार नसेल तर ठीक आहे पण मदतकार्यात अडथळा न आणण्याच काम तरी आपण करू शकतो कि नाही? 

हि एक घटना उदाहरण म्हणून झाली, पण रोजच्या जीवनात आपण अशी किती तरी उदाहरण पाहात असतो. रस्त्याच्या बाजूला काही खुदाईचे वैगेरे काम चालू असेल तर झालेली बघ्यांची गर्दी आपण कित्येकदा पहिली असेल. अश्या गर्दीमुळे वाहतुकीला साहजिकच अडथळा निर्माण होतो आणि ट्रॅफिक जॅम होतो. अश्या वेळी एखादी ऍम्ब्युलन्स किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत कार्यासाठी जाणारी अग्निशामक दलाची गाडी अश्या ट्रॅफिक मध्ये अडकल्यामुळे हॉस्पिटल मध्ये किंवा घटनास्थळी नियोजित वेळेत पोहोचली नाही आणि ऍम्ब्युलन्स मधील किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये अडकलेल्या लोकांमधील काहींना आपला जीव गमवावा लागला तर याला जबाबदार कोण? देशात राहात असताना एक व्यक्ती म्हणून आपल्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या आपण कधी स्वीकारायला शिकणार आहोत? अश्या वेळी एक प्रश्न सर्वांच्या समोर उभा राहतो तो म्हणजे, यांत्रिकीकरणाच्या या युगात आपण आपली मानवी संवेदनशीलता कुठे तरी हरवत चाललो आहोत का?